झाडांच्या श्वासावर दिव्यांचा झगमगाट नको…!

पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांचे मुख्यमंत्र्य आणि पर्यावरण मंत्री यांना भावनिक आवाहन.
दिवाळीचा झगमगाट सुरू झाला आहे. ठिकठिकाणी रस्ते, सोसायट्या आणि बागा दिव्यांच्या प्रकाशाने उजळल्या आहेत. मात्र या कृत्रिम रोषणाईच्या आड झाडांच्या श्वासावर गदा येतेय, या गंभीर आणि भावनिक मुद्यावर ठाण्यातील पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन पाठवून झाडांवरील विद्युत रोषणाईस तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.
“दिवसरात्र आपल्याला प्राणवायू देणाऱ्या झाडांना दिव्यांच्या माळांनी जखडणे म्हणजे त्यांच्या श्वसनक्रियेलाच अडथळा आणणे होय. सणाचा आनंद निसर्गाचा बळी देऊन साजरा होऊ नये,” असे डॉ. सिनकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी झाडांवर हॅलोजन्स, एलईडी आणि रंगीबेरंगी दिव्यांच्या माळांनी सजावट केली जाते. काही क्षण आकर्षक वाटणारी ही रोषणाई झाडांच्या जीवनप्रक्रियेला गंभीर धक्का देते. सूर्यास्तानंतर झाडांची विश्रांती सुरू होते, मात्र कृत्रिम प्रकाश त्यांच्या जैविक घड्याळात गोंधळ निर्माण करतो, त्यांच्या वाढीवर आणि आरोग्यावर परिणाम करतो.
फक्त झाडेच नव्हे तर पक्षी आणि निशाचर प्राणीही या प्रकाशामुळे विस्कळीत होतात. दिशाभ्रम, घरटी कोसळणे आणि अंधाराशी सवयीने जगणाऱ्या प्राण्यांचे जीवन उद्ध्वस्त होते. “झाडांवरील रोषणाई थांबवणे ही केवळ सौंदर्याची नव्हे, तर शास्त्रीय गरज आहे,” असे डॉ. सिनकर यांनी अधोरेखित केले.
त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजाताई यांना केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, “सण म्हणजे आनंद, प्रकाश आणि उत्साह पण तो निसर्गाचा बळी देऊन नसावा. झाडे, माती, पाणी आणि प्राणी पक्ष्यांचा सन्मान केला तरच आपण खऱ्या अर्थाने ‘निसर्गपूजा’ करू शकतो. म्हणूनच आगामी सणासुदीच्या काळात झाडांवरील कृत्रिम रोषणाईस सक्त बंदी घालण्याचे आदेश द्यावेत.”
दिवाळी, नाताळ, नववर्ष अशा प्रत्येक सणात झाडांवरील विद्युत रोषणाई सुंदर दिसत असली तरी पर्यावरणासाठी विध्वंसक ठरते. मानवी आरोग्यावरदेखील याचा विपरीत परिणाम होतो निद्रानाश, ताण, डोकेदुखी अशा समस्या वाढतात, असेही त्यांनी नमूद केले.
*
दरम्यान, ठाणे महापालिकेने पर्यावरणपूरक दिवाळीचा नारा दिला असला तरी प्रत्यक्षात शहरातील झाडांवर दिव्यांचा झगमगाट दिसून येतो आहे. “पालिकेचे पर्यावरण केवळ दिखाऊ राहिले असून झाडांच्या संरक्षणाकडे कोणीही लक्ष देत नाही,” अशी टीका पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
*
दिवाळीचा खरा प्रकाश निसर्गाच्या हृदयात आहे, झाडांच्या जखमांमध्ये नव्हे. दिव्यांनी सजलेले झाड सुंदर दिसते, पण त्या प्रकाशात एक सजीव गुदमरतोय...!”
प्रतिक्रिया द्या
संबंधित बातम्या

अर्धशतकानंतरही उपवन उद्योजकांची कोंडी सुटेना, मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांशी आ.केळकर यांची चर्चा


